ब्रँडचे नाव : अपरांत
हाब्रँड कोकणातील हस्त-कलाकारांनी टाकाऊ प्लास्टिक अपसायकलिंग करून बनवलेल्या पर्स, बॅग, लॅपटॉप बॅग इत्यादी वस्तूंचा आहे.
अपरांतम्हणजे कोकण. अपरांत म्हणजे पश्चिमेकडील देश. प्राचीन साहित्यात अपरांतक असे नाव आढळते. पौराणिक साहित्यात निर्देशल्याप्रमाणे पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्या दरम्यानचा आधुनिक कोंकणपट्टीचा प्रदेश म्हणजे अपरांत देश. ब्रँड लोगो पाहता त्यात कोकणातील प्रमुख झाड नारळ व समुद्र हे त्या भागाचे अविभाज्य घटक दाखवले आहेत.
ब्रँडचे वेगळेपण म्हणजे या ब्रँडखाली विकल्या जाणाऱ्या सर्व वस्तू या कोकणातील कलाकारांनी प्लास्टिक कचऱ्यापासून अपसायकल पद्धतीने बनवलेल्या आहेत. विशेष म्हणजे या ब्रँड खाली येणाऱ्या वस्तू त्यांची गुणवत्ता उत्तम असते व किंमत योग्य असेल यांची काळजी घेतली जाते. यामुळे प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर होतो व कचऱ्यात, समुद्रात, जमिनीत जाणारे प्लास्टिक वाचवले जाते.
प्लास्टिक कचऱ्यातून जमवले जाते, ते स्वच्छ करून सॅनेटाइज केले जाते. नंतर सुकवले जाते. पुढे याच्या बोटभर रुंदीच्या पाट्या काढून एका पुढे एक जोडून एका लाकडीपट्टीवर गुंडाळी जाते. आम्ही बनवलेल्या हमागावर त्याचे प्लास्टिक कापड बनवले जाते.
या कपड्यापासून सुती कापडाचे अस्तर लावून सुंदर पर्स, बॅग, इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. याना प्लास्टिक अपसायकल बॅग म्हणतात. यामुळे कचऱ्यातील प्लास्टिक पुन्हा वापरले जाते जे नंतर आपण परत रिसायकल करू शकतो. अन्यथा हे प्लास्टिक कचऱ्यात, पाण्यात, मातीत मिसळून गेले असते.
सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण या सामाजिक संस्थेच्या (NGO) पाठबळाने हा ब्रँड बनवण्यात आला आहे. आमचा उद्देश पर्यावरणातील प्लास्टिक प्रदूषण कमी करणे हा आहे.
सह्याद्री निसर्ग मित्र ही १९९२ साली स्थापन झालेली निसर्गसंवर्धन विषयात काम करणारी आघाडीची संस्था आहे. संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील सागरी कासव संरक्षण मोहीम, कासव महोत्सव, भारतीय पाकोळी संरक्षण संवर्धन, पांढऱ्या पोटाचा सागरी गरुड, जगात सगळ्यात जास्त शिकार होणारा प्राणी खवले मांजर याच्या संरक्षण संवर्धनाचेप्रकल्प यशस्वी केले आहेत. याचबरोबर कोकणातील शाळामध्ये निसर्गशिक्षण,शेती, नेत्रदान, इत्यादी विविध विषयात भरीव कामगिरी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणात प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न गंभीरपणे उभा आहे. अन्न म्हणून खाल्ल्यामुळे अनेक प्राणी पक्षी मरत आहेत. मायक्रो प्लास्टिकमुळे प्लास्टिक मानवाच्या रक्तात पोचले आहे. याचसाठी संस्थेने चार वर्षापूर्वी प्लास्टिक रिसायकल हा प्रकल्प चिपळूणमध्ये चालू केला आहे.
लोकांना प्लास्टिक कचऱ्यात टाकू नका, आम्ही ते रिसायकल करतो, असे म्हणत आजपर्यंत ८५ टन प्लास्टिक कचऱ्यात, पाण्यात, मातीत जाण्यापासून वाचवले आहे. ते जमवून आम्ही वर्गीकरण करून रिसायकला पाठवले. त्यातील मल्टीलेअर प्रकारचे प्लास्टिक रिसायकल होत नाही त्यासाठी आम्ही अपसायकल करणे चालू केले.
कोणाच्याही तांत्रिक मदतीशिवाय सहा महिन्यात अपसायकलिंगचे तंत्रज्ञान उभे केले. त्यासाठी हॅन्डलूम स्वतः तयार केले व यापासून बनवलेल्या वस्तूसाठी अपरांत हा स्वतंत्र ब्रॅन्ड तयार केला आहे.
यामध्ये मुख्यत्वे खालील वस्तू येतात :
१) कचऱ्यात टाकलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या (अपसायकल) बॅग,पिशव्या, पर्स.
२) कागदाच्या लगद्यापासून विविध पक्षी, प्राणी यांचे वॉलपीस.
Website: www.aparant.in
Email: aparantcpn@gmail.com
सदर बॅग www.aprant.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.