पतंजली :: फूड प्रोसेसिंग स्टार्टअपची यशोगाथा

अन्नप्रक्रिया उद्योगात भाग घेऊ इच्छिणार्‍यांनी ‘पतंजली’च्या यशाचा अभ्यास केला पाहिजे. हा एक जगावेगळा स्टार्टअप आहे आणि मंदीच्या काळातसुद्धा भल्या भल्या प्रस्थापित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पोटात गोळा उभा राहावा अशा वेगाने हा उद्योग वाढत आहे. पतंजली हे फास्ट मुव्हिंग कन्झुमर गुड्समधला एक चमत्कारच म्हणावा लागेल.

या प्रकारच्या उत्पादनात इतका चांगला दर्जा क्‍वचितच पाहायला मिळतो आणि किमती तुलनेने १०-२० टक्के कमी आहेत आणि पतंजलीने डिस्ट्रिब्युशन साखळी तर हिंदुस्थान लिव्हर आणि कोकाकोला यांनी हेवा करावा अशी उभारली आहे.

यापाठीमागे त्यांच्या टीमचे अथक प्रयत्न आहेत. त्यांच्या या कौशल्याला व्यवस्थापनाच्या भाषेत content marketing म्हणता येईल. कंटेंट मार्केटिंग म्हणजे ग्राहकांना आपल्या मालाच्या गुणांवर, किमतीवर आकर्षित करणे आणि यासाठी जाहिरातीच्या मार्गाचा नव्हे, तर उत्पादनाच्या दर्जाचा अवलंब केलेला आहे.

आजकाल आपण दूरदर्शन आणि माध्यमांमध्ये जाहिरातींवर भर दिलेला पाहतो. स्पर्धक कंपनीचा माल ढकलून दूर केलेला पाहतो. प्रत्येक उत्पादन आपल्या चांगलेपणाचे प्रदर्शन करत असते, पण पतंजलीच्या नावातील हा एक वेगळेपणा आहे. इतर साबणांच्या जाहिरातींना नट्या लागतात. येथे रामदेवबाबासारखा साधू-संन्यासी सर्व उत्पादनांच्या पाठीमागे दिसतो.

गेल्या दशकात बाबा रामदेव यांनी आपल्या उत्पादनांविषयी काहीच सांगितले नाही. ते फक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांचे दुष्परिणाम सांगत होते. ते स्वदेशीचा अभिमान सांगत होते. ते रासायनिक खतांच्या दुष्परिणामांविषयी सांगत होते आणि त्यांच्या उत्पादनाविषयी काहीच सांगत नसत. त्यातून त्यांनी ग्राहकांना उत्पादन कसे निवडावे याचे जणू प्रशिक्षणच दिले. विशेषत: उत्पादनाच्या सभोवतालचे ज्ञान दिले. आपली तुतारी वाजवली नाही.

बहुतेक उत्पादने स्वत:ची टिमकी वाजवण्यात इतकी मग्‍न होतात की ग्राहक बोअर होतो. या सभोवतालमध्ये आहे कॉर्पोरेट सेक्टरचा भ्रष्टाचार, आहे शेतकर्‍यांची पिळवणूक, आहेत रासायनिक खतांचे कॅन्सरसारखे परिणाम. ग्राहकाने स्वत:हून चांगले उत्पादन निवडण्याविषयीचे हे मार्गदर्शन.

आजची बाजारातील बहुतेक उत्पादने ‘ओव्हर सेलिंग’ over selling करत असतात त्यामुळे खरे तर हल्ली नेहमीपेक्षा वेगळे उत्पादन ट्राय करायचा प्रयत्नच करत नाही.

सर्व प्रकारच्या वाईट पद्धतींना पर्याय आहे. येथे उत्पादन विक्रीसाठी कोणी ‘पुश’ करत नाही, तर ग्राहक स्वत:च स्वदेशीचा अभिमान बाळगून आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मालाच्या तोडीचा माल चांगल्या २० टक्के कमी भावात स्वत:हून खरेदी करतो. तो ‘willing consumer’ असतो. त्यांची टूथपेस्ट बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत तेवढीच चांगली असते. वेगळ्या हर्बल चवीची असते आणि ग्राहकाला समाधानही मिळते. आता तुम्ही पतंजलीची उत्पादने शहरातच नव्हेत तर खेडेगावातही विकत घेता.

आपण नवीन पिढीचे उद्योजक. आपण ‘पतंजली’पासून प्रस्थापित मोठमोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेत कसे उभे राहायचे हे शिकावे. पतंजली हा एक स्टार्टअप् आहे, उत्पादन गुणांवर विकणारा, डिस्ट्रिब्युशन चेन तयार करणारा. त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी अनुकरणीय आहे.

जर तुमचा स्टार्टअप यशस्वी व्हायचा असेल तर –
  • आपले उत्पादन सर्वोत्तम होईल, त्याचे मार्केटिंग नावीन्यपूर्ण असेल आणि दीर्घकाळचे ग्राहक मिळतील याकडे लक्ष द्या.
  • जाहिरातीतले वरवरचे बोलणे, दृश्ये प्रेक्षक पाहतात; पण ते खरेदी करत नाहीत. खरेदी करताना ते value for money कडे पाहतात.
  • जाहिरातीतले खोटे दावे ग्राहकाला कळतात. तुमच्या ग्राहकाला काय पाहिजे ते शोधा.
  • ग्राहकाचा आपल्या उत्पादनांवर कायमचा विश्वास बसला पाहिजे.
  • आपल्या कंपनीच्या व्यक्तिमत्त्वावर विश्वास बसला पाहिजे. उत्पादनाच्या किमतीत सातत्य हवे.
  • पतंजली ब्रँडला राजकीय घडामोडींचा लाभ तसेच तोटा झालेला आहे.
  • ते त्यातून तावून सुलाखून निघाले आहेत. तावून सुलाखून निघणे महत्त्वाचे.
  • हॅव ए ग्रेट प्रॉडक्ट.
  • बाकीचे सगळे बकवास आहे.

पुढच्या २-५ वर्षांत पतंजलीच्या जागतिक यशाच्या गोष्टी ऐकायला तयार राहा आणि हो, आपली स्टोरी अशीच असावी.

पतंजलीविषयी सारे काही थोडक्यात

  • जगातला सर्वात मोठा फूड पार्क.
  • ६,५०० कर्मचारी. जास्तीत जास्त फ्रँचायजी दुकाने ५००/१५०० वर्गफुटांची जास्तीत जास्त धंदा ‘माऊथ पब्लिसिटीतून’.
  • त्यांच्या हर्बल उत्पादनांमुळे इतर हर्बल उत्पादकांची विक्रीही वाढत आहे.
  • या कंपनीला कोणतेही कर्ज नाही म्हणून बँका कर्ज द्यायला तयार आहेत.
  • नजीकच्या भविष्यात सहा ठिकाणी विशेषत: दुष्काळी भागात प्रकल्प उभारणार.
  • त्यातील एक विदर्भात असेल. संशोधनासाठी १५० कोटींची तरतूद.
  • नजीकच्या भविष्यात डेअरी उद्योगात भाग घेतील.
  • तसेच पशुखाद्याच्या क्षेत्रातही भाग घेतील.
  • निर्यात व online ने विक्री वाढवतील.
  • हल्ली ४००० वितरक व १०,००० दुकाने आहेत.
  • १०० मेगा मार्ट्स आहेत.
  • त्यांची उत्पादने स्वस्त असतात, कारण अधलेमधले दलाल नाहीत. तसेच विक्रीचा खर्च कमी केला आहे.
  • ते शेतकर्‍यांकडून थेट खरेदी करतात.
– पद्माकर देशपांडे
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Scroll to Top